जगाबरोबर रहाण्याचं समाधान या क्षेत्रात आहे.

एखादं काम शिकून घेतल्यानंतर पुन्हा तेच काम करण्यात लहानपणापसून मात्र कधीच रुची वाटली नाही. सतत नव्या गोष्टींचा शोध घेणं आणि त्या करता येतील का ते अजमावण, याचं मोठं आकर्षण तेव्हाही होतं आणि अजूनही ते कायम आहे. या हव्यासापोटी शाळेत असताना अभ्यसाबरोबर खो-खो,कबड्डी,नाटक,नाच,स्काउट- गाईड आणि अन्य मैदानी खेळांत भाग घेण, सारखं बक्षीस घरी घेऊन येणं हे आवडायला लागलं. हेच सत्र पुढे लातूरच्या दयानंद महाविद्यालयात शिक्षण घेत असताना सुरु राहिलं, पण यात आणखी एका गोष्टीची भर पडली ती म्हणजे महाविद्यालातल्या कार्यक्रमांचं वृत्तांकन करायचं आणि स्थानिक दैनिकात छापायला द्यायचं. यातूनच पुढे माझ्या करिअरने आकार घेतला.

१९८८-८९ मध्ये बी.कोम. ची पदवी हातात पडल्यानंतर थेट औरंगाबाद गाठलं. मराठवाडा विद्यापीठात बी.जे. साठी प्रवेश मिळवला आणि वर्षभरातच दै. ‘लोकमत’ मध्ये उपसंपादक म्हणून रुजू झाले. तिथं काम करताना विलक्षण समाधान मिळत होतं. खेड्यातून आलेली असल्यामुळे मोठ्या थाटात, मोठ्या संस्थेत , स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणात काम करायला मिळणं हे खरोखरच खूप हुरळून टाकणारं होत. तिथंच आयुष्याचा जोडीदार अजय भेटल्यामुळे तर हा आनंद द्विगुणित होणं स्वाभाविक होतं.

यू.पी.एस.ई. ची परीक्षा देण्याचा निर्णय मी घेतला. त्यात पास होऊन भारत सरकारच्या पत्र सूचना कार्यालयात पुण्याला मला पहिली पोस्टिंग मिळाली. नंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या दूरदर्शन मध्ये मी दाखल झाले. गेली १० ते १२ वर्ष मी या संस्थेशी निगडीत आहे. वार्ताहर , भाषांतकार , वृत्तनिवेदक आणि सहायक वृत्तसंपादक म्हणून.

वर्तमानपत्रातल्या नामाचा अनुभव असल्यामुळे इलेक्ट्रोनिक मीडियामध्ये काम करनं सोप्पा गेलं. वर्तमानपत्र दिवसातून एकदाच प्रकाशित होता. त्यामुळे दिवसभर स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित कारण जमतं. आपल्या कॉप्या वरिष्ठ तपासतात, सूचना करतात त्यामुळे शिकायला मिळायचं आणि कामाचा ताण तेवढा जाणवायचा नाही, पण टी.व्ही. मध्यी काम करताना सतत घड्याळ्याच्या काट्यावर नजर ठेवून वेळेवर बातमीपत्र तयार करणं, ते वाचणं , वेळेवर कार्यालयात ( फिल्डवर असते तिथे ) पोहचणं ही कसरत दिवसरात्र करावी लागते. कारण दिवसाला अनेक बातमीपत्र. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत शिफ्टमध्ये काम करत राहणं, याचा ताणही भरपूर येतो. सतत नवीन चांगलं काहीतरी देता येईल, यासाठी सदोदित प्रयत्न करत राहणं गरजेच होऊन बसतं, पण जगाबरोबरच राहता येण्याचं सुख या नोकरीत नक्कीच अनुभवता येतं. एखद्या बँकेत किंवा कार्यालयात १० ते ६ काम करणं ही माझी मनोवृत्ती कधीच नव्हती. या नोकरीत भरपूर प्रवास, रात्री उशिरापर्यंत काम, मोठमोठ्या व्यक्तींशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायला मिळणं, यातून आपलही व्यक्तीमत्व घडत जातं हे प्रत्ययाला आलं. मोठं होण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षातून त्यांच्यात आपोआप साधेपण येत असावं, असं वाटून जातं. लतादीदी,आशाताई , बाबा आमटे ,रघुनाथ माशेलकर , विजय मतकर यांना भेटल्यावर अस वाटतं.

मीडियामध्ये महिला म्हणून वावरताना अनेकींना त्रास झाल्याचं त्या खाजगीत गप्पा मारताना सांगतात, पण या बाबतीत मी सुदैवी ठरले. आपल्या प्रोजेक्ट होण्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात असं मी मानते. या व्यवसायाने मला अनुभवसंपन्न बनवलं. कामात समाधान दिलं. त्यामुळे वेगळी वाट चोखाळायचा निर्णय २० वर्षापूर्वी घेतला तो योग्य होता अस आज मला वाटतं. आता या क्षेत्रात अनेक मुली येत आहेत. त्या अधिक आत्माविश्व्साने काम करताना पाहून आनंद वाटतो.

मंत्रालय, विविध राजकीय पक्षांची कार्यालयं इथं सहजपणे महिला पत्रकार वावरताना फारशा दिसत नाहीत. त्या व्यवसायात फिरणंण, नेटवर्क तयार करणं अपेक्षित असतं, पण रात्रीच्या पार्ट्या टाळण्याकडे बहुतेक महिला पत्रकारांचा काळ असतो. त्याला कारणंही अनेक आहेत. जवळपास सगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी तुमचा थेट संबंध येत असल्यामुळे संकुचितपणा कमी व्हायला मदत होते. हट्टाग्रही भूमिका कमी होते. तुम्हाला स्वतःला तुमची चौकट माहिती असली , स्वतःच्या मर्यादा माहीत असल्या आणि काम करणं सोपं जातं, असं मला वाटतं. सतत शिकण्यची तयारी ठेवली तर नाविन्याचा आनंद आणि कामात मिळणारं समाधान आपल्याकडून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही हे मात्र निश्चित.